नळदुर्ग :- तुळजापुर तालुक्यात नियम धाब्यावर बसवुन पवनचक्की उभारण्याचे काम करणाऱ्या कंपन्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नळदुर्ग शहर भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, सध्या तुळजापुर तालुक्यात विविध कंपन्याकडुन पवनचक्की उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. यामध्ये तालुक्यातील बसवंतवाडी, चिवरी, बोरनदवाडी, हगलुर, मानेवाडी, गंधोरा, मुर्टा, चिकुंद्रा, व अणदुर या गावांच्या शिवरामध्ये मोठ्या प्रमाणात पवनचक्की उभारण्यात आले आहेत. एक पवनचक्की उभारण्यासाठी सात एकर जमीन अकृषी लागते. मात्र शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोल किमतीने दीर्घाकाळासाठी करार करुन घेऊन पवनचक्की उभारण्यासाठी कंपनी जमीन ताब्यात घेत आहे.या जमिनीमध्ये जाण्यासाठी अनेकांच्या जमिनीवर रातोरात मुरूम टाकुन तसेच महामार्गालागतचे झाडे तोडुन पवनचक्की उभारण्याचे काम केले जात आहे. मात्र याकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लाखो रुपयांचा मुरूम रॉयल्टी न भरता तसेच महसुल व भुमी अभिलेख कार्यालयाची परवानगी न घेता पवनचक्की उभारणाऱ्या कंपन्या रस्ते तयार करत आहेत. भविष्यात ही मोठे डोकेदुखी ठरू शकते. त्याचबरोबर अणदुर शिवारात असलेल्या एका गॅस गोडाऊन परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजुनी पवनचक्की उभारण्यात आले आहेत हे नियमबाह्य आहे. कारण गॅस गोडाऊन परीसरात वीज पडण्याच्या भीतीने टॉवर, मनोरे उभारले जाऊ नयेत हा नियम आहे असे असतांना पवनचक्की उभारणाऱ्या कंपन्या हा नियम धाब्यावर बसवुन गॅस गोडाऊन परिसरात पवनचक्की उभारले आहेत. यामुळे भविष्यात याठिकाणी मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने याबाबत कडक पावले उचलुन नियमबाह्य पवनचक्की उभारणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर नळदुर्ग शहर भाजयुमोचे अध्यक्ष गणेश मोरडे, विजयसिंग ठाकुर, अक्षय भोई व राहुल ठाकुर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक व तुळजापुर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
